नीलिमा अनिल मायदेव
ओम नमो भारतभूमाते
नमन तुज प्रथम करिते
नंतर नमन करिते
संस्कृतभाषा जन्मदात्रीते
कवि कालिदासाचे करिते गुणगान जी जी जी जी जी ll
नमन करिते कालिदासांच्या आईबाबांना
जरी ते अज्ञातच असती
कालिदास होता शेखचिल्लीसम
ज्या फांदीवर बसे
तीच तोडीत असे जी जी जी जी जी ll
एका बुद्धिमान विद्योत्तमेशी विवाह केला
प्रथमच राजकन्या विद्योत्तमेने जाणिले
हा तर कालिदास आहे मूर्ख
तिने त्यास घराबाहेर काढिले जी जी जी जी जी ll
तो गेला कालीदेवीच्या मंदिरी
तिची उपासना कष्टाने केली
कालीमातेला वाटू लागले
यास बुद्धिमान करावे
कालिदासाने ज्ञान प्राप्त केले
सुशिक्षित कालिदास विद्योत्तमेकडे घरी गेला जी जी जी जी जी ll
ती त्यास घरात घेईना
तिने त्यास विचारले —
‘ अस्ति कश्चित वाकविशेष:? ‘
त्याने ‘अस्ति’ सुरुवात करोनि
‘कुमारसंभवम ‘ महाकाव्य लिहिले जी जी जी जी जी ll
‘कश्चित ‘ पासून सुरुवात करोनि ‘मेघदूत ‘हे खण्डकाव्य लिहिले
‘वाकविशेष ‘ पासोनि ‘रघुवंश ‘हे महाकाव्य लिहिले जी जी जी जी जी ll
भोजराजाच्या दरबारी
तो राजकवी म्हणून नावाजला गेला जी जी जी जी जी ll
त्याच्या लेखनाचा विशेष ‘उपमालंकार ‘
या अलंकाराची त्याच्या लेखनात पखरण जी जी जी जी जी ll
एकदा कालिदासाला भोजराजाने
‘शेवटचा माझा श्लोक वाच ‘म्हणूनि सांगितले
कालिदासास ते अशुभ वाटोनि
कालिदासाने धारानगरीचा त्याग केला
तो ऐकशिलानगरीस गेला जी जी जी जी जी ll
भोजराजा दुःखी जाहला
त्याने साधुवेश धारण केला
तो देखील एकशिलानगरीस गेला जी जी जी जी जी ll
साधुवेशातील भोजराजास कालिदास भेटला
कालिदासाने त्यास ‘ भोजराजे कसे आहेत? ‘
असा सवाल केला जी जी जी जी जी ll
साधु तर उत्तरला ‘भोजराजा दिवंगत झाला ‘
हे ऐकोनि कालिदासाने विलाप केला
कालिदास म्हणू लागला
‘धारा निराधार झाली, सरस्वती निराधार झाली
ज्ञानी, पंडितही बुडाले जी जी जी जी जी ll
‘राजाविना माझे जीवन व्यर्थ जाहले ‘
असा विलाप करू लागला
साधुवेशातील भोजराजा प्रकट की हो झाला
दोघे आनंदाने धारानगरीस परतले
कालिदास नि भोजराजा समसमासंयोग की जाहला जी जी जी जी जी ll
कालिदासाने दोन महाकाव्ये ‘रघुवंश ‘ कुमारसंभव ‘ लिहिली
दोन खंडकाव्ये ‘ऋतुसंहार, मेघदूत ‘नामे लिहिली
‘अभिज्ञानशाकुंतल, विक्रमोर्वशीय, मालविकाग्निमित्र ही
तीन नाटके लिहिली जी जी जी जी जी ll
‘अशक्य ते शक्य करिता सायास ‘हे सिद्ध करून दाविले जी जी जी जी जी ll
नीलिमा अनिल मायदेव
itsmeriyapendse@gmail.com
शाळेत संस्कृत शिक्षिका म्हणून 27 वर्षे कार्यरत होते.
2009 साली सेवा निवृत्त झाले.
Be the first to comment